कथा ऐका ढाण्या वाघाची
सह्याद्री अन् कैलासाच्या शिखराची
गंगा आणि कृष्णेच्या महतिची
भवानी आणि शंभू अवताराची
कथा ही आमच्या शिवबाची रं....... हो .......जी जी जी जी जी
मेघ यवनी जमले दारुण
केले जनतेचे सुख हरण
काज नाही राहिले जगण्या कारण
भलेभले फिरले जहागिरी कारण....... हो .......जी जी जी जी जी
जनता झाली अवघी ही त्रस्त
दुश्मनाने केले स्वराज्य फस्त
कर्ते झाले दारू नादात मस्त
शहाजी राजा मनी राहिना स्वस्थ
अजून कोणी धरीना वाट रास्त....... हो .......जी जी जी जी जी
सगळा झाला असा हा कहर
भर वैशाख जसा हर प्रहार
सैतानी उन्मादाचा ज्वर
कोणी पुढे येईना भीड़ण्या नर....... हो .......जी जी जी जी जी
वेळ आली सूर्य उगवण्याची
वेळ आली प्रजेला धीर देण्याची
बातमी आली शिवनेरीची
जगद्द् माउली जीजाऊची....... हो .......जी जी जी जी जी
माता जीजाऊ प्रसवली
देव जी जन्माला घाली
उत्कर्षाची मुहूर्तमेढ़ रोवली
सैतानी चक्रे उलटी फिरली ...... जी ........जी जी जी जी जी
जन्म झाला शिवनेरिवर
शंभू जसा अवतरला भूवर
प्रजेमधे झाला हर्ष जागर
स्वर्गी जमली सभा आणि गुरुवर
हाच तो कलियुगी विष्णू अवतार ....... हो .......जी जी जी जी जी
हा बाळ राजा मोठा झाला ......प्रजेत रमला ..... रानात ..डोंगरात.... किल्ल्यात वाढला... प्रजेला समजला ....... उमगला..... हृदयात बसला.
सैतानी वारे अजून थांबले नव्हते , शिवबा पण निश्चयाला हटले नव्हते.
सगळे स्वराज्याच्या तयारीत मग्न होते, मावळे घरावर तुळशी पत्र अन् निखारा ठेवून होते. सगळे आता फ़क्त वाट बघत होते.
वेळ आली, समय आला, खान भेटायला यायचा निरोप आला.
दुश्मनाचा काळ जवळ आला, दुश्मन दांडगा कपटी भेटायला आला, नुसती नजरानजर झाली. बदल्याची आग शिवबाच्या मस्तकात गेली, हृदयात वीज चमकली, हाताच्या मुठी वळल्या अन् मस्तकात तांडव झाले, प्रजेचा बदला घ्यायची वेळ जवळ आली
शिवबा तेजाने असा संचरला
मावळी संख्येला विसरला
दुश्मनी गर्दीला ना भ्याला
दुश्मन मातीत घालण्याचा पण केला ....... हो .......जी जी जी जी जी
भेट झाली गाठ पडली; स्वर्गात भवानीने त्रिशूळ उगारले अन् रामरायाने धनुष्य ताणले.
दुश्मनाने घात डाव केला
शिवबाने प्रति घाव मारला
उभा देह धरून आडवा कापला
हर हर महादेव यलगार ....... हो .......जी जी जी जी जी
एका मागून एक कार्य फत्ते झाले. शिवबाच्या हृदयाच्या मनातील मुगुटात हीरे जडत गेले; काही हातीचे कंकण लढाईत गळत गेले. पण विचार वाढत राहिला, स्वराज्याचा विस्तार सूर्यकिरणाप्रमाणे होत गेला, जिथे जिथे पोचला तिथला अंधार दूर केला. आई बापाच्या विचाराचे चीज झाले, रामराज्य भूवरी अवतरले. सर्व जीव धन्य झाले.
दिवस सोन्याचा उगवला
रत्नजडित सिंहासनाला सजविला
वेदपुराण जयघोषाला....
वेदपुराण जयघोषाला....साथ झाली सनई चौघड्याला
आमचा राजा छत्रपति विराजमान ....... हो .......जी जी जी जी जी
आलबेल आलबेल झाले, प्रजेचे डोळे सुखाने पाणावले, सुखाचे घास अन् आयुष्याचे दिस आनंदाने सरू लागले. सगळे राजाच्या छायेत विसावले.
असा प्रजेचा मालक होणे नाही, असा राजा होणे नाही, कारण सोपे आहे, एकच विष्णूअवतार दोनदा होणे नाही.
आज माणूस पारखा झाला, स्वराज्याला विसरला, तत्वांना मूठ माती देऊ लागला,
मूळची एकी विसरला, हा माझा; हा त्याचा असा भेद करू लागला; आजचा तरुण हातचा गेला , दारू, नशा आणि अध:पतनाला लागला, सगळा परिणाम समोर दिसू लागला
आणि , आणि........... जो तो पुन्हा एकदा शिवबा अवतरण्याची वाट पाहू लागला.
शिवबाने जे केले तेच मूळात विसरला, शिवबाने प्रत्येक मावळ्यात स्वत:ला पाहिला, नेमका हाच बदल आज घडला आणि माणूस स्वराज्याला मुकला.
घेऊ शिवबाचे ते वचन
करुया फितुरीचे ते पतन
मिटवूया भेद अणि वर्ण
जागूया मैत्रीचे वचन
करुया स्वत: राष्ट्र आराधन
चेतवू हर हर महादेव जागरण ....... हो .......जी जी जी जी जी