प्रसंग - नळ दुरुस्ती
नवीन ठिकाणी राहायला आलो होतो, नेहमीची आवरा-आवरी,
केर काढणे, वस्तू जागेवर लावणे, दुध , वर्तमानपत्र वाल्याची चौकशी करणे अशी कामे करत
होतो. हात-पाय धुवायला गेलो तर नळ गच्च बसला होता, आता पंचाईत झाली. बाजूला फरशीपासून
कमी उंचीवर छोटा नळ होता; तात्पुरते काम भागले, पण मुख्य नळ दुरुस्त करणे गरजेचे होते.
अंधार पडायला लागला होता, बाहेर पडलो सुरक्षा रक्षकाकडून नळ दुरुस्त करणाऱ्या प्लंबरचा
मोबाईल क्रमांक घेतला ; त्याचे नाव नंदू. कल्पना नव्हती मला… असा विलक्षण संवाद झाला…
वेळ संध्याकाळी ७ ची .
मी- फोन केला पूर्ण वेळ रिंग वाजली पलीकडून फोन उचलला नाही, अशा वेळी आपण जरा जास्तच उतावीळ आणि अस्वस्थ होतो, क्षणाचा विलंब न करता परत फोन केला …( पलीकडून फोन उचलला .
(www.saarthbodh.com)
नंदू- ह SS ह ख SSख घशात आवाज काढत … मंद्या
किती वेळ वाट बघतोय … कुठायस …असा प्रश्न झाला , मी गोंधळलो …अहो मी मंद्या नाही .
सचिन बोलतोय, तुमचा नंबर त्या सिक्युरिटी वाल्या विकास कडून घेतला … आता पलीकडे एकदम
शांतता झाली. नंदू म्हणाला साला मिष्टेक झाली काय साहेब? मला; तो विचारतोय कि सांगतोय
हेच कळेना. असो. मी म्हणालो अहो माझ्या घरातला एक नळ दुरुस्त करायचा आहे, मी नवीन
राहायला आलो आहे नंदन गार्डन मध्ये तुम्ही कराल का? नंदू म्हणाला, अहो नळ दुरुस्त करायचा
तर एकांदा पलंबर गाठा ना राव, मला कशाला फोन केला? या वक्ताला !!!. मी चपापलो.
म्हणालो आपल्याला सिक्युरिटी ने गंडवला का काय !!!.
ओके ओके. मला त्या विकास ने नंबर दिला हो. नंदू
म्हणाला आओ ! विकास उद्या माझा नंबर डॉक्टरचा म्हणून देईल. तुम्ही काय तब्येत दाखवायला
याल का मला, काय पण राव विंटेलीजंट माणूस, न बघता
फोन करता … मी- सॉरी तुम्हाला त्रास दिला. फोन
कट. (www.saarthbodh.com)
म्हणलो आता जाऊन त्या सिक्युरिटी वर कट काढू.
मी बाहेर जेवलो, एक दोन वस्तू घेऊन परत चाललो , तेवढ्यात मला नंदूच्या फोन वरून फोन
आला, मनात म्हणले आता काय त्रास आहे यार याचा. फोन उचलला. पुन्हा घशातली खर खर ऐकू
आली. साह्येब मगाशी मिष्टेक झाली काय!!. साला परत तेच… विचारतोय का सांगतोय हेच
कळेना. मी म्हणालो अहो सॉरी तुम्हाला चुकून फोन केल. तो म्हणाला तुम्ही नाही
सॉरी … म्या सॉरी. मी नंदू पलंबर बोलतोय. मी म्हणालो अहो मग मगाशी नाही का म्हणाला?
ते काय मगाशी माझ्या भावाने फोन उचलला. एकंदरीत आवाज ऐकून पलीकडे तार छेडली गेली आहे,
हे मी ओळखले, एव्हाना ८ वाजून गेले होते. नंदू बोलला भावाने फोन घेतला हो, बोला काय
काम आहे. मी म्हणलो अहो आवाज तर हाच होता, नंदू बोलला जुळे… आम्ही दोघे जुळे
आहोत, (दोन घोट पोटात गेले कि जास्त चांगल्या कारणे/कल्पना माणसाला सुचत असव्यात) म्हणून तसे वाटले असेल तुम्हाला. मगाशी मंद्या आला नव्हता आणि खेळ सुरु झाला
नव्हता आणि आता घसा ओला झाल्यामुळे सगळी लिंक लागली आहे, हे माझ्या लक्षात एव्हाना
आलेच होते. (www.saarthbodh.com)
हम्म म्हणालो… चला ठीक आहे. , नंदू - बोला साहेब
काय काम आहे. मी म्हणलो नळ बसवायचा आहे. नंदू - ओके बसवला आणि काय काम आहे. मी म्हणलो
अहो बघायला लागेल ना आधी, नंदू - ओके बघितला; पुढे ? मी -अहो कसला नळ आहे ठरवायला नको
का?, नंदू -ओके ठरवला , आणि काय काम? मी - अहो नंदू शेठ … (त्याच्या या तत्पर उत्तरांना
कंटाळून मी त्याचा शेठ केला होता). अहो मला सांगा पैसे किती ? तो बोलला ६५ , असली आड-नीड
किंमत ऐकून मी वेडा झालो. अहो पण नवा नळ लावायचा असेल तर, तो म्हणे १६५. आणि पाईप खराब
असेल तर, तो म्हणे २६५. मी म्हणलो अरे हे दर वेळी ६५ काय आहे? तो म्हणाला साहेब आमची
चपटी संत्रा ६५ ला येते, उरलेले कामाचे पैसे. मी म्हणलो अरे !! दारू का पिता?, फळाचा
ज्यूस वगैरे प्या. नंदू बोलला, मग संत्र काय आहे?, फळच आहे ना... काय मजाक करता काय
गरीबाची !!! साहेब. मी काय समजायचे ते समजलो, उद्या या ... मग बोलू ... असे म्हणून फोन ठेवला.
©
सचिन पु. कुलकर्णी
www.saarthbodh.comFB ID - sachin.kulkarni78
Comments
Post a Comment